Friday, September 6, 2013

आईस पत्र… 2



                                           श्री                                               १७-०८-२०१३
तिर्थरूप मम्मिस,
शिरसाष्टांग नमस्कार. "कशी आहेस??" हल्ली चेन्नई (गेल्या वर्षी हैदराबाद) वरून आल्यावर घरात आल्या आल्या मी तुला हा प्रश्न विचारतो. मी हातपाय धुवायला जाताना तू किचन मधून बाहेर येणं आणि माझ्या ह्या प्रश्नाला उसन अवसान आणून "एकदम मस्त!!" अस म्हणन आत्ता सवयीच झालं आहेआत्ताही तू हा प्रश्न वाचल्या वाचल्या असाच म्हणाली असशील अशीही खात्री आहे. यतिनच्या लग्नातले फोटो पाहण्यात आलेतू खूप थकलेली वाटलीस. वरती "उसनं अवसान" म्हणालो ते ह्या साठीच. काळजी घेत जा (हे तू ऐकणार नाहीस ह्याचीही खात्री आहेच. पण जसं आईच मन काळजी करणं सोडत नाही तसाच काहिसं त्याच आईच्या मुलाच्या मनाचंही होत असेल म्हणून म्हणतो काळजी घेत जा.)

इतक्या वर्षांनंतरही तुझी पूर्वीसारखीच सर्वच्या सर्व कामं करण्याची दगदग जराही कमी झालेली नाही. पण आत्ता थोडं सबुरीने घ्यावस अस वाटत. वयाबरोबर शरीरही थकत जात हे एकदा मनाशी ठरवलं कि कामाचा आवाकाही कमी करता येतो. तो तू करावास. पप्पानी हे योग्य वेळेत समजून अंमलात आणलेलं आहेच (अपवाद फक्त विचारे परिवाराच्या मिटिंगचा). "देवाने दिलेल्या शक्तीचा जपून वापर करा रे !!" हे तुझेच वाक्य आहे.

पत्राची सुरुवातच तुझं बौद्धिक घेऊन केली आहे, कारण ह्या नंतर माझं बौद्धिक घेतला जाणार आहे. UPSC परीक्षेचा (आणि माझा) निक्काल लागला ..यश नाही मिळालं. तू म्हणतेस तसे सर्व प्रयत्न ओतूनसुद्धा यशाने हुलकावणी दिली. मार्क अजून आले नाहीत पण खात्री आहे कि CUT ऑफ केवळ - मार्कांनी गेला असणार. खूप वाईट वाटलं. खोट बोलणार नाही. पण रात्रभर तळमळत होतो. सकाळी लवकर उठून एका क्रिकेटच्या म्याचला जायचे होते. मन अजिबात नव्हते पण त्या टीम ला अगोदरच सांगितलं असल्यामुळे गेलो. उठल्यापासून ते म्याच सुरुहोई पर्यंत डोळे भरून येत होते. प्रश्नपत्रिके मधले उत्तर माहित असून सुद्धा नजरचुकीमुळे चुकलेले प्रश्न डोळ्यांसमोर येत होते. पण काय करणार...  चालायचंच.


हे पत्र लिहिण्याचं खर कारण हे कि, मी निराश झालो असेन सावरायला वेळ लागेल असा तुझं समज झालेला असणार असे वाटले. मम्मी, अपयश हे मला नविन नाही. मागे Engineeringla असताना मिळालेली KT, त्यावेळी खाल्लेले टक्के टोणपे ह्यांनी बराच शिकवलं आहे. २००८ ला CAT मध्ये ९५ percentile मिळूनसुद्धा कोणत्याही collegela admission झाले नव्हते. वैयक्तिक आयुष्यातही वादळ आली होती. बरोबरचे मित्रही अमेरिकेला किंवा MBAla गेली होती. खूप एकटा पडलो होतो. घर होतंच तुम्ही सगळेही होताचं. पण त्या सर्व अपयशांनी खूप शिकवले. त्या सर्वातून अधिक कणखर होवून बाहेर पडलो होतॊ. तेच सगळे आज ह्या अपयशात कामाला येत आहे. ध्येय मोठी ठेवली आहेत त्यामुळे अपयश पण मोठेच येणार ह्याची मानसिक तयारी करावीच लागेल.

खर तर हे शनिवार रविवार जोडून बरेच जण मुंबईला गेले आहेत. office मधल्या मित्रांनीही सुट्टी मारली आहे. पण मी मुद्दामच येणे टाळले. मम्मी, मला आत्ता स्वत:ला सावरायला शिकायला हवं. स्वताच स्वत:चं. घर असतंच, पण ह्या पुढे नोकरी निम्मित्ताने घराबाहेर राहणेच जास्त होईल त्यामुळे आलेली निराशा झटकून लवकरात लवकर पुन्हा त्याच जोमाने अभ्यासाला लागायला हवं. तेच करायचा प्रयत्न करतोय. पत्रातून तुला एवढेच सांगणे आहे कि निश्चिंत राहा. मी भरकटणार नाही ह्याची खात्री बाळग. लहानही राहिलो नाही आत्ता. (तुला लहानच वाटतो हा भाग वेगळा). असो.

बय्राचदा फोनवर बोलणं होतं, पण पप्पा नेमके बाहेर फिरायला (तूझा "उंडगायला" हा शब्द जाणीवपूर्वक टाळतो आहे) गेलेले असतात. त्यांना म्हणावं त्यांचा एक मुलगा इतक्या दूर राहतो आहे तर भल्या माणसाने कधी चार शब्द बोलाव कि नाही? तसं मी त्यांचा डाव ओळखलेला आहे. यतीन अमेरिकेला होता नी फोन करून त्यांना बोलवायचा तेव्हा नेमकं काही न काही काम सांगायचा. आपण फोनवर गेलो कि हे दोघं (मी आणि यतीन) आपल्याला काही कामं तर सांगणार नाहीत ना अशी भीती वगैरे घेतली कि काय त्यांनी? हा हा हा हा.. चालायचेच. ह्या पत्रातून त्यांच्याशीही दोन शब्द बोलेन म्हणतो.

" काय आप्पा? आज कुठे गप्पा मारायला नाही गेलात??" (हा माझा नी यतीनचा त्यांना ठरलेला प्रश्न आहे. सुरुवातच अशी असते). पप्पा, कसे आहात?? (तब्येत थोडी नरम गरम आहे हे आत्ता संपूर्ण जगाला माहित झाले आहे) :) :) :) विचारे परिवार काय म्हणतो?? तुमची जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तुम्ही बाहेरच्या खोलीतल्या किंवा आतल्या खोलीतल्या कॉटवर झोपून पेपर वाचत बसलेले (किंवा झोपलेले) असणार असेच आठवते. डोळे किलकिले करून मिश्किल हसून "आपला काय... चालू आहे" असे म्हणाला असाल. काळजी घ्या. दुपारचं उन्हातानातून फिरत जाऊ नका, लोकं तुम्हाला नाही पण आम्हाला शिव्या घालतील.. शिवनेरी काय म्हणते?? हल्ली पाउस असल्यामुळे कॉलनीमध्ये कुठे क्रिकेटची म्याच चालू असेल तर येता येता तिथे घुटमळणेही नसेल होत तुमचं. रोज ठरलेल्या वेळेला चक्कर मारून येण्याच्या सवयीमुळे ओळखीचे झालेले दीपक, राजू, गणेश मनी आणि इतर लोकं काय म्हणतात ?? तुम्हाला कधी बोललो नाही पण इथे एखादा वयस्कर माणूस पहिला कि तुमची आठवण खूप येते. हातात दोन सामानाच्या पिशव्या, तोंडात पान, घामाघूम झालेले तुमचे कपडे (आणि वर देव आनंद style टोपी) हा तुमचा "अवतार" आठवतो. तो रिकामटेकडा यतीन आहे ना, त्याच्या ...... वर लाथ मारून आत्ता सगळी कामं त्याला करायला सांगा. (मी तिकडे आलो कि मला सांगू नका ... मी लहान असतानाचा माझा फेवरेट डिफेन्स आठवतोय ना ?? हे काम तुम्ही यतीनला सांगीतलेलात ना .. आत्ता ते मी नाही करणार :) :) )  

बाकी विशेष काय मम्मी?? रक्षाबंधन येते आहे, पण मी तिथे नसणार. हे आत्ता बहुतेक नेहमीचेच झालं आहे. नेहा राखी पाठवते पण त्या बदल्यात तिला काही देत येत नाही.  हम्म.. चालायचंच.. तू आणि पप्पानी आत्ता तिच्या लग्नाच्या विषयाला हात घालायला हवा. थोडं सिरीयसली घ्या. माहीत आहेत तुमची उत्तर पण .. तरीही आत्ताच सुरुवात केलीत तर बर पडेल शेवटी मीही इतक्या दुरून तुम्हाला सल्ला देन योग्य नाही पण आत्ता दुसरं मी काही करूही शकत नाही. बघ, जमेल तसे प्रयत्न सुरु ठेव.

एक-दोन आठवड्यापूर्वी रात्री वाचत बसलेलो असताना एक गाणं ऐकलं. तू ऐकल असशील, नसेल तर यतीनला youtube वर दाखवायला सांग. जूनं गाणं आहे. रफी आणि लता ने गायलेलं. शशी कपूर आणि शर्मिला टागोरवर चित्रित आहे. चित्रपट आहे आमने सामने (१९६५). गाण्याचे बोल आहेत, "कभी रात दिन हम दूर थे .. अब दिन और रात का साथ है.." रफीने गाण्याची सुरवात केली आहे ना....लाजवाब एकदम .. जरूर ऐक. जुन्या गाण्यांची आवड ही एक कॉमन गोष्ट आपल्यात नसती तर मी पप्पांना हिला कुठेतरी दूर सोडून या, असे एक हजार नाही तर एक लाख वेळा (दररोज) ऐकवले असते.   

बाकी काय म्हणतेस.. नविन सून आली आहे, त्या सुनबाई काय म्हणतात?? परवा सहजच होम मिनिस्टर (आदेश बांदेकर भावोजी वालं) बघताना एक सासू आपल्या सुनेचं करत असलेलं कौतुक पाहून तुम्हा दोघांची (सासू सुनेची) आठवण झाली. वहिनींशी वरचेवर बोलण होत. खूप चांगलं चांगलं बोलत होत्या तुझ्याबद्दल.. कमाल झाली. तू अवंतिका (आणि तद्दन) मालिका पाहून खाष्ट, खडूस सासू बनण्यासाठी केलेली मेहनत वाया गेली म्हणायची :) :) .. एक एपिसोड चुकवला नाहीस.. आठवतंय ना, अवन्तिकाची सासू कशी हाक मारायची .. (एकदम कडक) .."अवंतिका, आज तुमचा हे वागणं आम्हाला अजिबात आवडलेलं नाही.."

परीक्षेचा रिझल्ट लागल्यापासून एक गाणं मोबाईलवर बय्राचदा ऐकतो. कोणतं गाणं कधी ऐकावसं वाटेल काही सांगता येत नाही. .. तुझं माझं आवडतं गाणं आहे. मुकेशने गायलेलं. त्या गाण्याच्या शेवटच्या पण कदाचित सगळ्यात महत्वाच्या ओळीनी पत्राचा शेवट करतो.. खूप मनाला लागतात ह्या ओळी..

                     प्रीत जगाके तुने जिना सिखाया
                     हसना सिखाया .. रोना सिखाया
                     जीवन के पथ पर मित मिलाये
                     मित मिलाके तुने सपने दिखाये
                     सपने जगाके तुने ..काहे को दे दि जुदायी...
                 काहे को दुनिया बनायी, तुने काहे को दुनिया बनायी..
                     दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मी सामायी..
                 काहे को दुनिया बनायी, तुने काहे को दुनिया बनायी..
  

                        तूझा,  
                        (हल्ली वाहिनिंकडून कळलं, तू माझा उल्लेख  
                         "रंगीला रतन" असा करतेस... 
                                अरे काय हे.. इतका वाईट...
                                   रंगीला...  ते पण रतन ...?? )

                                  निखिल चंद्रकांत विचारे                          

              (मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..
              (तू आणि पप्पानी) ..पाठीवरती हात ठेवून फक्त "लढ" म्हणा...) 

 

2 comments: